राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू - प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू
◈ प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
भारतात दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी भाषा
दिवस’ म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक राष्ट्राची एक विशेष भाषा असते, जी त्या राष्ट्राच्या
संस्कृतीची, अस्मितेची, आणि अभिव्यक्तीची परिभाषा बनते. हिंदी भाषा ही आपल्या भारताच्या
विविधतेतील एकतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. भाषिक विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला एकसूत्रात
बांधण्याचे कार्य हिंदी भाषेने निश्चितच केले आहे. भारताच्या संदर्भात, हिंदी ही फक्त एक भाषा
नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण द्योतक आहे. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाचा होता. महात्मा गांधींनी हिंदीला जनतेची भाषा
म्हटले होते, कारण ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारी आणि त्यांच्यात एकजूट निर्माण
करण्याची भाषा
प्रचंड
शक्ती होती. आधुनिक भारतात हिंदीचे
महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी कामकाज, शिक्षण, साहित्य, चित्रपट, आणि प्रसार
माध्यमे या सर्वच क्षेत्रात हिंदी भाषेची महत्त्वपूर्ण
भूमिका राहिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी, ज्याला 'बॉलिवूड' म्हणून ओळखले जाते, जिने आज
जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
हिंदीमधील साहित्यानेही जागतिक दर्जाचे साहित्यिक योगदान दिले आहे. देशाच्या
प्रत्येक कानाकोपऱ्यात, विविध भाषा, बोली आणि संस्कृतींचा ध्वज फडकणारा भारत, एक असा
देश आहे जिथे अनेक भाषांचा संगम होतो. या विविध भाषांमध्ये हिंदी भाषा एक प्रमुख भूमिका
बजावते.
भारतीय राज्यघटनेने कोणत्याही भाषेला अधिकृतपणे
राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. तथापि, भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३(१) मध्ये असे
म्हटले आहे की, "संघाची अधिकृत भाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल." इंग्रजीचा
वापर अधिकृत हेतूंसाठी करण्याची परवानगी देखील असेल. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४४ (१) आणि ३५१ नुसार
आठव्या अनुसूचीत आजपर्यंत २२ प्रादेशिक भाषांना मान्यता देण्यात आली आहे, ज्यांना अनुसूचित
भाषा म्हणतात. सध्या भारतात २२ अधिकृत भाषा आहेत. याशिवाय, संस्कृत, तामिळ, मल्याळम,
कन्नड, तेलगू आणि ओडिया या भाषांना भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. भारतात आजमितीला 1600 पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत, ज्या विविध राज्यांमध्ये आणि समाजांमध्ये
बोलल्या जातात. प्रत्येक प्रमुख भाषेच्या अंतर्गतही अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. सध्या, गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार
राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये आणखी ३९ भाषांचा समावेश करण्याची मागणी होत आहे.
त्यात राजस्थानी, बंजारा, भोजपुरी, अंगिका, अवधी,
लडाखी इत्यादी ३९ भारतीय भाषांचा समावेश आहे.
कायदे, न्यायव्यवस्था, तसेच केंद्र आणि राज्य सरकार
यांच्यातील संप्रेषण यांसारख्या अधिकृत हेतूंसाठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा वापर
केला जातो. मात्र, भारतातील गैर-हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये, विशेषत: द्रविड भाषिक राज्यांमध्ये,
ज्यांच्या भाषांचा हिंदीशी संबंध नव्हता, त्यांच्यांत मोठी चिंता निर्माण झाली होती.
परिणामी, राजभाषा कायदा 1963 मध्ये संसदेने मंजूर केला, ज्यामुळे 1965 नंतरही अधिकृत
हेतूंसाठी हिंदीसोबतच इंग्रजीचा वापर सुरू ठेवण्याची हमी दिली गेली.
भारतीय कायद्यानुसार, जोपर्यंत भारतीय संघराज्याची
सर्व राज्ये मान्यता देत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता
देता येणार नाही. घटनेच्या कलम ३४३ नुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्र
शासनाच्या व्यवहाराची प्रमुख भाषा आहे, तर इंग्रजी ही दुसरी सहकारी भाषा आहे. 1950
साली, इंग्रजीचा व्यवहारातील वापर बंद करण्याचे घटनेने मान्य केले होते, परंतु दक्षिण
भारतातील राज्यांच्या विरोधामुळे 1965 नंतरही इंग्रजीचा वापर सुरूच राहिला.
सध्या केंद्र शासनाशी व्यवहार करताना हिंदी किंवा
इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर करण्यात येतो. ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी नाही,
त्यांच्याशी व्यवहार करताना इंग्रजीचा वापर केला जातो, आणि ज्या राज्यांची अधिकृत भाषा
हिंदी आहे, त्यांच्याशी हिंदीचाच वापर केला जातो.
हिंदी भाषेचा उगम प्राचीन काळापासून सुरू झालेला
आहे. संस्कृतपासून विकसित झालेल्या अनेक प्राकृत भाषांमधून हिंदीचा जन्म झाला असे भाषातज्ज्ञ
मानतात. हिंदी भाषेचा विकास मध्ययुगीन काळात
भक्तिकवी संत कबीर, सूरदास, तुलसीदास आणि मीराबाई यांच्या रचनांमुळे झाला. आधुनिक हिंदीचा
विकास १८ व्या शतकात सुरू झाला आणि भारतेन्दु हरिश्चंद्र, महावीर प्रसाद द्विवेदी,
प्रेमचंद आणि मैथिलीशरण गुप्त यांसारख्या प्रख्यात
लेखकांनी हिंदीला एक नवा आयाम दिला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हिंदीने महत्वपूर्ण भूमिका
बजावली आहे. महात्मा गांधींनी हिंदीला 'राष्ट्रभाषा' म्हणून मान्यता दिली. हिंदी भाषेच्या
माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांनी आपले विचार व्यक्त केले, समाजात एकता निर्माण केली
आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण केली.
आज हिंदी भाषा देशातील एक प्रमुख संवादाचे माध्यम
बनली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी बोलणारे आणि समजणाऱ्या लोकांची संख्या
सर्वाधिक आहे.
हिंदी सिनेमांपासून ते टीव्ही मालिका, साहित्य, पत्रकारिता, आणि इतर सर्व माध्यमांत
हिंदीचा वापर प्रचंड प्रमाणात होत आहे. भारतीय राज्यघटने जरी कोणत्याही भाषेला अधिकृतपणे
राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नसला तरी भारत सरकारने हिंदीला अधिकृत भाषा म्हणून महत्त्व
दिले आहे. सरकारी कामकाज, न्यायालयीन प्रक्रिया आणि संसदीय चर्चा यांत हिंदीचा वापर
वाढवला जात आहे.
शिक्षणातील कोठारी आयोगाने 1966 साली सुचवलेले
त्रिभाषा सूत्र भारतीय शिक्षण प्रणालीत भाषाशिक्षणाचे एक महत्त्वाचे तत्त्व ठरले आहे.
या सूत्रानुसार, भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध स्तरांवर तीन भाषांचे शिक्षण
देणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे,
ते म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा किंवा स्थानिक भाषा, एक राष्ट्रीय स्तरावरील
भाषा आणि तिसरी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय भाषा शिकवली जावी असे कोठारी आयोगाने त्रिभाषा
सूत्र सांगितले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार मातृभाषा, स्थानिक
भाषा, आणि प्रादेशिक भाषांना विशेष महत्त्व दिले आहे. या धोरणाने बहुभाषिक शिक्षणाला
प्रोत्साहन दिले आहे आणि विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास त्यांचा शैक्षणिक
विकास अधिक चांगला होईल, असा विश्वासही व्यक्त
केला आहे. त्याचबरोबर, त्रिभाषा सूत्राचा वापर करण्याचेही या धोरणात नमूद केले आहे.
या सूत्रानुसार, विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकण्याचा पर्याय देण्यात आला आहे, ज्यात
एक भाषा मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा, दुसरी हिंदी आणि तिसरी इंग्रजी किंवा इतर कोणतीही
भाषा असू शकते. या शैक्षणिक धोरणानुसार, भारतीय भाषांचा विकास, संवर्धन आणि प्रचार
यांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना त्या त्या राज्यात बोलली जाणारी
प्रमुख भाषा शिकवली जावी. यामुळे स्थानिक प्रशासनिक आणि सामाजिक संवादात भाग घेणे सोपे
जाते. महाराष्ट्रात, यामध्ये मराठी शिकवली जाते. विद्यार्थ्यांना एक आंतरराष्ट्रीय
किंवा संपर्क भाषा शिकवली जावी, जी बहुतेक वेळा इंग्रजी असते. इंग्रजीचा समावेश विद्यार्थ्यांना
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संवाद साधण्यात आणि व्यवसायिक संधींमध्ये मदत
करु शकेल.
हिंदी भाषा आता केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण
जगात प्रसिद्ध आहे. हिंदीची लोकप्रियता केवळ भारतीय समाजातच नव्हे, तर परदेशी नागरिकांमध्येही
वाढत आहे. हिंदी सिनेमे, गाणी आणि टीव्ही कार्यक्रमांमुळे हिंदीची लोकप्रियता जगभर
पसरली आहे. अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला गेला
आहे.
हिंदी भाषेतील प्राविण्यामुळे अनेक क्षेत्रांत
रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अनुवाद, पत्रकारिता, शिक्षण, फिल्म इंडस्ट्री, साहित्य,
आणि सरकारी सेवांत हिंदी भाषेतील ज्ञान आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या युगात हिंदी भाषेतील
कौशल्य रोजगाराच्या विविध संधी निर्माण करत आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही हिंदी
भाषेने आपली छाप सोडली आहे. इंटरनेट, मोबाइल अॅप्स, आणि सोशल मीडियावर हिंदी भाषेचा
वापर वाढला आहे. हिंदीत उपलब्ध असलेल्या विविध डिजिटल संसाधनांमुळे या भाषेचे महत्त्व
अधिकच वाढले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदीचे संरक्षण आणि संवर्धन होऊ लागले
आहे.
राष्ट्रीय हिंदी दिन हा फक्त
भाषेचा उत्सव नाही, तर ते एक राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. हिंदी दिन साजरा
करून आपण आपल्यातील विविधतेला एकत्र एका मालेत गुंफतो. हिंदी दिनाच्या निमित्ताने शाळा,
महाविद्यालये आणि विविध शासकीय संस्थांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये
हिंदी भाषेची महती सांगितली जाते
भविष्यात हिंदी भाषेची भूमिका आणखी महत्वपूर्ण
होणार आहे. नव्या पिढीला हिंदी भाषा शिकवणे आणि तिचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे.
भाषेच्या संवर्धनासाठी शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
हिंदीचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. हिंदी भाषेचे डिजिटल संवर्धन
आणि त्या माध्यमातून जागतिक स्तरावर तिचे प्रचार-प्रसार करणे ही काळाची गरज आहे.
हिंदी
भाषा हे केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. हिंदी
दिवस हा आपल्या राष्ट्रीय भाषेच्या महत्त्वाचा
आणि तिच्या व्यापकतेचा उत्सव आहे. या दिवशी आपण हिंदी भाषेच्या संवर्धनाचा संकल्प करावा
आणि आपल्या पुढील पिढ्यांना तिची महत्ता पटवून द्यावी. राष्ट्रभाषेच्या स्वरूपात हिंदीचा
आदर राखून आपण आपल्या देशाच्या एकात्मतेचे आणि समृद्ध संस्कृतीचे जतन करूया. हिंदी ही आपल्या राष्ट्राची ओळख आहे, ती आपल्या
मनातील विचार, भावना आणि संस्कृती व्यक्त करण्याचे साधन आहे. हिंदी दिनाच्या निमित्ताने
आपण सर्वांनी एकत्र येऊन या भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदीच्या
माध्यमातून आपण आपल्या देशाच्या अस्मितेचे जतन करू शकतो, आणि तिचा प्रचार-प्रसार करून
तिचे स्थान अधिक मजबूत करू शकतो.
◆ डॉ. सुभाष राठोड
‘विश्वास
पॅराडाईज’ नर्हे रोड, पुणे 41
टिप्पण्या